पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही   

मुंबई, (प्रतिनिधी) : नागपुरात सोमवारी रात्री जो प्रकार घडला तो जाणीवपूर्वक करण्यात आला. निश्चितपणे यात काहींचा सुनियोजित आराखडा दिसत आहे. या हल्ल्यात तीन उपायुक्तांसह ३३ पोलिस जखमी झाले. एका उपायुक्तावर तर कुर्‍हाडीने हल्ला झाला. त्याशिवाय, पाच नागरिक जखमी झाले आहेत. पोलिसांवरील हल्ला अजिबात सहन केला जाणार नाही. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांना अजिबात सोडण्यात येणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिला.  
 
महाराष्ट्र प्रगतिशील राज्य आहे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. इथे शांतता राहिली तर आपण प्रगतीकडे जाऊ. यापुढे कोणीही दंगल घडविण्याचा प्रयत्न केला तर जात-धर्म न पाहता कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 
 
नागपूर येथील हिंसाचाराबाबत फडणवीस यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती दिली. हल्ला पूर्वनियोजित असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, परवा सकाळी साडेअकरा वाजता महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेब कबर हटाओ म्हणत आंदोलन केले. गवताची प्रतिकात्मक कबरही जाळली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. सायंकाळी अफवा पसरविली गेली की, जी प्रतिकात्मक कबर जाळली त्यावर धार्मिक मजकूर होता. सायंकाळी जमाव जमला व घोषणा दिल्या. हंसापुरी भागात दोनशे ते तीनशे जणांचा जमाव दगडफेक करू लागला. त्यात बारा दुचाकींचे नुकसान झाले. सायंकाळी साडेसात वाजता दुसरी घटना घडली. समाजकंटकांनी एक क्रेन, जेसीबी जाळले. सायंकाळी काहींनी जाणीवपूर्वक हल्ला केला. कारण, तिथे एक ट्रॉली भरून दगड मिळाले. काहींनी दगड जमा करून ठेवले होते. शस्त्रे देखील मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. काही घरांना आणि दुकानांना ठरवून लक्ष्य करण्यात आले, असे फडणवीस यांनी सांगितले. नागपुरात ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस महासंचालकांनी राज्यभर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांवरील हल्ले अजिबात सहन करण्यात येणार नाहीत. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झाले तरी सोडण्यात येणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

शांततेचे आवाहन

छावा या चित्रपटाने खरा इतिहास समोर आणला. राज्यात लोकांच्या भावना प्रज्ज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा राग बाहेर येत आहे. असे असले तरी सर्वांनी संयम राखला पाहिजे. महाराष्ट्र राज्य प्रगतिशील आहे, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. इथे शांतता राहिली तरच प्रगतीकडे जाऊ. यापुढे कोणीही दंगल घडविण्याचा प्रयत्न केला तर जात-धर्म न पाहता कारवाई केली जाईल, असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, अर्जुन खोतकर यांनी जालना शहरात देखील छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर पोलिस कठोर कारवाई करतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related Articles